७०च्या दशकात ‘The Myths of Sisyphus’ नावाचे एक पुस्तक प्रकाशित झाले होते. यात Sisyphusच्या काल्पनिक कथा दिलेल्या होत्या. या Sisyphusला एक शिक्षा देण्यात आलेली असते. त्या अंतर्गत त्याला दररोज एक मोठा दगड ढकलत-ढकलत डोंगरावर घेऊन जायचा असतो. दररोज भल्या पहाटे Sisyphus हा दगड डोंगरावर ढकलायला सुरुवात करत असतो. दुपार होईपर्यंत Sisyphus ज्यावेळी डोंगराच्या माथ्यावर पोहोचतो त्याचवेळी त्याच्या शिक्षेच्या दुसऱ्या भागाची सुरुवात होत असते. ज्या क्षणी Sisyphus दगडावरचा हात सोडतो त्याचक्षणी तो दगड पुन्हा एकदा त्या डोंगरावरून घरंगळत पायथ्याशी येतो. पुन्हा दुसऱ्या दिवशी सकाळी Sisyphus पुन्हा एकदा दगड लोटायला सुरुवात करतो. कधीही अंत नसलेली अशी शिक्षा होती.
हि काल्पनिक कथा असली तर आजच्या काळात आपल्या अवती-भोवती असे अनेक Sisyphus प्रत्यक्ष आपल्या शहरात,गल्लीत फिरत असतात, फक्त आपले त्यांच्याकडे लक्ष नसते इतकेच आणि आपण त्यांना Sisyphus म्हणून नाही तर कचरा वेचणारे म्हणून ओळखतो. हातावर पोट असलेली हि लोकं.
ही ती लोकं आहेत जी खांद्याला एक पिशवी अडकवून भल्या पहाटे घरातून बाहेर पडतात. दिवसभर शहरातील विविध भागात, रस्त्यांवरून, कचरापेटीतला कचरा तुडवत फिरतात. जमवलेला हा कचरा अत्यंत कमी दरात व्यावसायिकांना विकतात आणि मिळणाऱ्या अल्प उत्पन्नावर त्या दिवसापुरती जेवणाची सोय करतात आणि झोपी जातात दुसऱ्या दिवशी पुन्हा पहाटे खांद्यावर पिशवी अडकवून कचरा शोधायला बाहेर पडण्यासाठी.
कचरा व्यवस्थापनामध्ये सगळ्यात उपेक्षित गट म्हणून या गटाकडे बघितल जातं. शहरातील लोकांना त्यांचे घर, रस्ते साफ तर हवे असतात मात्र हे साफ कोण करतं याविषयी त्यांना फारसे घेणे-देणे नसते. त्यांना कचरापेटीत आकंठ बुडालेला एखादा छोटा मुलगा पाहून वाईट तर वाटते पण कोण हे लोक? कसे जगत असतील हे? काय प्रश्न भेडसावत असतील यांना? आपण २ मिनिट देखील सहन करू शकत नाही अश्या घाणीत आणि वासात कसे काम करत असतील हे? असे प्रश्न मात्र पडत नाहीत.
कचरा वेचकांकडून विकत घेतलेल्या कचरा उच्च दरात भंगारवाले या कचऱ्यावर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांना विकतात. हे कारखाने त्या मालावर प्रक्रीया करून पुनरुत्पादित केलेला माल आणखी चढ्या किमतीत विकतात. हे व्यावसायिक या कचऱ्यावर मालेमाल तर होतात मात्र अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत कष्ट करून जीवन जगणारा हा कष्टकरी समाज मात्र नेहमी उपेक्षितच राहतो. अशिक्षितता, सतत अस्वच्छ वातावरणात राहण्याने निर्माण होणारे आरोग्याचे गंभीर प्रश्न, अपुरा पैसा आणि व्यसने यामुळे दैनंदिन जीवनात त्यांना असंख्य समस्यांना तोंड सतत तोंड देत राहतो.
‘वर्धिष्णू सोशल रिसर्च & डेव्हलपमेंट सोसायटी’ या संस्थेच्या माध्यमातून ऑगस्ट-सप्टेंबर, २०१३ मध्ये घेतलेल्या कचरा वेचकांच्या सामाजिक-आर्थिक सर्वेक्षणात देखील हीच बाब समोर आली होती. या सर्वेक्षणात मुलाखत घेतलेल्या ३९६ लोकांपैकी २९६ अशिक्षित होती. तर ६०% हून अधिक लोकांना व्यसन होते. महत्वाची बाब म्हणजे यात ११४ लहान म्हणजे वय वर्षे १४खालील मुल/मुली होती. हि सगळे लोक त्यांच्या एकूण उत्पन्नापैकी ५०% हून अधिक रक्कम व्यसनावर खर्च करतात अशी माहिती आमच्या समोर आली.
शाळेत शिक्षकांकडून मानहानीकारक वागणूक दिली जाते, त्यांच्या भावनांना समजून न घेता सतत अमानुष मारहाण केली जाते. ‘मास्तरने इतक्या जोरात कानाखाली मारली कि आजबी कानामंदी आवाज घुमतो’ असे अनेक जणांकडून ऐकायला मिळेल. शाळेत मार मिळतो म्हणून शाळा सोडल्याची अनेक उदाहरणे आम्हाला आज दिसतात.
सतत घाणीत वावरणे. पुरेशी स्वच्छता न पाळणे. तसेच कचऱ्यात हात टाकताना कोणत्याही साधनंचा वापर न केल्याने अनेक लोकांना हात पायाला काच, पत्रा यासारख्या धारदार वस्तू लागून जखमा होतात तर पावसाळ्यात साप देखील चावतात. पावसाळ्यात साप चावून मेल्याची देखील काही उदाहरणे आहेत.
जखमांसोबतच लहान वयातच दमा, चक्कर येणे, दुर्गंधीचा त्रास होणे यासारख्या समस्यांना या लोकांना तोंड द्यावे लागते.
आजारी पडल्यावर देखील बहुसंख्य लोकांचा कल हा औषधे न घेता तसेच आला दिवस ढकलण्यावर असतो. याचे मुख्य कारण नाजूक आर्थिक परिस्थिती हे सांगितले जाते. तर या खालोखाल दवाखाना आणि डॉक्टरची भीती हे देखील उपचार न घेण्याचे कारण सांगितले जाते. तसेच ताप, अशक्तपणा यांसारख्या आजारावर बाबा, भगत यांसारख्या अप्रशिक्षित व्यक्तींकडे जाऊन उपचार घेतले जातात.
एक प्रकारे हि सगळी लोक शहरातील कचरा/घाण साफ करण्याचेच काम करत असतात पण याकडे शासकीय यंत्रणा आणि जनता सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात. कोठेही चोरी झाली कि संशयाचे पहिले बोट यांच्याकडेच दाखवली जाते. पोलिसांच्या / ठेकेदारांच्या अत्याचाराला यांना सतत तोंड द्यावे लागते. पहाटेच्या अंधारात कचरा वेचायला बाहेर पडलेल्या स्त्रीयांना पुरुषांच्या विखारी आणि वासनेने बरबटलेल्या नजरांना तोंड द्यावे लागते.
अशिक्षितता, अल्प उत्पन्न, व्यसनांवर होणारा भरमसाट खर्च, शासनाचे दुर्लक्ष, वाढती महागाई, वाढता खर्च आणि तो भागवण्यासाठी सतत काढलेले कर्ज याच्या ओझ्याखाली हा समाज दाबला गेला आहे. विविध भागात विखुरला गेलेल्या ह्या समाजाला संघटीत होऊन स्वताच्या हक्कासाठी लढावे, संघर्ष करावा अशी गरज देखील त्याला वाटत नाही. रोजचा खर्च निघेल एवढ ठेवायचं आणि बाकी पैसा व्यसनांवर खर्च करायचा एवढ आणि एवढच आयुष्य आज या समाजच आहे.
अगदी २६ नोवेंबरला जेव्हा संपूर्ण देश भारतीय जवानांच्या शौर्याला सलाम करत होता त्याच दिवशी ३ सफाई कामगार नाल्यात सफाई करत असताना गुदमरून मेले. मात्र कामगारांसाठी कुठलेही कॅण्डल मार्च निघणार नाहीत, यांच्या घरच्यांच्या मुलाखती घेतल्या जाणार नाहीत कि त्यांना कोणताही मोबदला मिळणार नाहीत. हा प्रश्न उपस्थित करताना कोठेही देशासाठी प्राण देणाऱ्या भारतीय वीर जवनाप्रती आदर व्यक्त करतानाच भारतीय समाजच दुटप्पी वागण्यावर मात्र बोट ठेवण भाग आहे. काय गरज होती त्यांना नाल्यात उतरण्याची? कोणी सांगितल होत? का उतरले होते ते त्या घाणीत? ते उतरले होते मी आणि तुम्ही केलेली घाण साफ करायला. आणि मग जर हे खर असेल तर त्यांच्या मृत्यूला जवाबदार कोण?
चोकलेट खाल्लं फेक कागद रस्त्यावर, गुटखा खाल्ला मार रस्त्यावर पिचकाऱ्या, पाणी पिल फेक पाऊच रस्त्यावर, भेल खाल्ली फेक कागद रस्त्यावर, फिरायला गेलो करा घाण. कोणीतरी ती उचलायला आहेच. आपण केलेली घाण साफ करण्यासाठी कोणीतरी आहे हि भावना जोपर्यंत मनातून निघत नाही तोपर्यंत रस्त्यावर दिसणारा कचरा कमी होणार आणि कि सफाई कामगारांचे प्रश्न.
याबाबतीत खुप सुंदर गोष्ट आहे. एका घरात एक लहान मुलगा त्याच्या आईला सांगायला येतो कि, ”आई बाहेर कचरावाला आलाय”. यावर त्यांची आई उत्तर देते,” बेटा कचरा तर आपण करतो ते तर सफाई करणारे आहेत”. जोपर्यंत सगळ्या घरातून हे संभाषण ऐकू येत नाही तोपर्यंत परिस्थिती बदलणे शक्य नाही.
उच्चभ्रू समाज अथवा इतर समाज आपल्याला सामावून घेणार नाहीत असा न्यूनगंड या समाजात खूप खोलवर रुजलेला आहे. आर्थिक विषमतेने जमीन-अस्मानाच अंतर निर्माण झालेलं आहे. जगण्याचे साधन कितीही घाण असले तरी त्याला पर्याय दिल्याशिवाय त्याचा त्याग करणे शक्य नाही. अश्या परिस्थितीत समाजाची या व्यवसायातून सुटका होऊन त्याचं सन्माननीय विकसनशील पुनर्वसन कस होईल याच उत्तर शोधले तरच यांचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.